नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणदेखील वाढलं आहे. दिल्लीत तर कोरोनानं अक्षरश: कहर केला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत कोरोनाचे १७ हजार २८२ नवे रुग्ण आढळून आले. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्हिटीचं प्रमाण १५.९२ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १०४ इतकी आहे.
मास्क न लावल्यास कोरोना होण्याचा धोका
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाची पहिली लाट आली होती. मात्र आता आलेली दुसरी लाट अधिक भीषण आहे. आधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० ते ४० टक्के व्यक्तींनाच कोरोनाची लागण व्हायची. आता हेच प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. कोरोना फैलावण्याचा वेगदेखील वाढला आहे. मास्क न घालता कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास अवघ्या मिनिटभरात तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढण्यामागे हे महत्त्वाचं कारण आहे. याआधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर १० मिनिटांनी कोरोना होण्याचा धोका असायचा. आता ही वेळ मिनिटावर आली आहे.
अधिक वाचा : राज्यासह अकोला जिल्ह्यात ३० एप्रिल पर्यंतचे संचारबंदी आदेश जारी, वाचा काय सुरु; काय बंद
बीएलके सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे श्वसनतज्ज्ञ डॉ. संजीव नय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा विषाणू अतिशय वेगानं हातपाय पसरत आहे. आधीच्या तुलनेत त्याच्या फैलावाचा वेग वाढला आहे. आधी परिस्थिती वेगळी होती. एखादी व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर १० मिनिटांनी तिला कोरोना होण्याचा धोका होता. पण आता एका मिनिटातच कोरोनाची लागण होत आहे. दिल्लीतील सर्वाधिक कोरोना रुग्ण ३० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. या वयोगटातली लोकसंख्या जास्त असल्यानं आणि ते कामासाठी बाहेर पडत असल्यानं रुग्णांमध्ये त्यांचं प्रमाण लक्षणीय आहे.
अधिक वाचा : देशात कोरोनाचा मोठा उद्रेक! २४ तासांत २ लाखांवर नवे रुग्ण