मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून वाढणाऱ्या रुग्णसंख्येने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवली आहे, अशातच आता शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने शिक्षण विभागाचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील काळात सरकार पर्यायी मार्गाचा विचार करणार असल्याचं विधान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
अगदी काही महिन्यांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत, अशातच कोरोना रुग्णवाढीमुळे परीक्षेवर भीतीचं सावट आहे, या परीक्षा यंदा तरी होणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे, परीक्षेवर योग्य पर्यायी मार्ग काढणार असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे, महत्त्वाचं म्हणजे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू असल्याचं ते म्हणाले, टीव्ही ९ मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात सध्या कोरोनाच्या आकडेवारीने गांभीर्य वाढलं आहे, राज्याच्या अर्थकारणाला पुन्हा लॉकडाऊन करणं परवाडणारं नाही, अशातच काही गोष्टींवर निर्बंध आणता येतील का याचा विचार सुरू आहे, यात लोकलच्या फेऱ्या कमी करणे, एसटी बसमधील गर्दी कमी करणे, सिनेमागृह-विवाहस्थळे येथे होणाऱ्या गर्दीवर आळा घालणे यासारख्या गोष्टींवर विविध पर्याय शोधावे लागणार आहेत. येत्या काळात हे निर्णय लवकरच अपेक्षित असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितले.