औरंगाबाद : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत ठरलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीचा धक्कादायक निकाल लागला आहे. भास्कराव पेरे पाटील यांची २५ वर्षे एकहाती सत्ता असणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीमधून पेरे पाटील यांनी माघार घेतली होती. नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र या निवडणुकीत पेरे पाटील यांची कन्या अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव झाल्याने पेरे पाटलांना हा धक्का असल्याचे मानले जात आहे.
११ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये या अगोदरच ८ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तीन जागांसाठी निवडणूक लागली असली तरी यात अनुराधा पेरे पाटील या सहज निवडून येतील अशी अटकळ बांधली गेली होती. मात्र या पराभवामुळे पेरे पाटील गटाविषयी मतदारांत नाराजी होती की काय अशी चर्चा आता राज्यभर सुरु आहे.