पातूर (सुनिल गाडगे)- दि.८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या पावसाने कपाशी,सोयाबीन अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सोयाबीन काढणी,कपाशी वेचणी जोरात सुरु होती.चेलका,निंबी,सेवानगर हे गटग्रामपंचायत असलेले ३३० लोकसंख्या असलेले छोटेसे गांव आहे चेलका या गावात शेतात जाण्यासाठी कोणताच शेतरस्ता तयार नाही. चेलका ते कोठारी बु।। आणि चेलका ते पांगरा(बंदी) या रस्त्त्याने लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी कोणीही “पावसाळ्यात शेतात जाऊन दाखवा १०,००० रु मिळवा.”असा नारा गावकर्यांनी दिला आहे. प्रत्येक रस्ता हा पांदन रस्ता आहे .गेल्या काही दिवसांपासुन पावसाने उघडीप दिल्यामुळे रस्ते कशेतरी चिखलातून सुरु होते. काल अचानक आलेल्या पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत.शेतातील तयार झालेल्या मालाची वाहतूक करणे कठिण आहे. चेलका येथील शेतातील तयार झालेले सोयाबीन ,कपाशी घरी आणण्यासाठी कोठारी,पांगरा (बंदी),निंबी शिवारातील रस्त्याने ५ कि.मी.अंतरावरून आणावे लागते.सरळ अंतर हे १ कि.मि.च्या आत आहे हे विशेष. हवामान खात्याने दि.१०ते१४ दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी मिळेल त्या मजुरीत बाहेर गावावरुन मजुर आणुन कापुस वेचणीस सुरुवात केली होती. परंतु पावसाने अचानक ८ तारखेलाच हजेरी लावली त्यामुळे चेलका येथील शेतकरी रामेश्वर पाटील यांच्या शेतातील कपाशी पिकांचे असे नुकसान झाले आहे. मागील वर्षी सुध्दा परतीच्या पावसाने असेच नुकसान केले होते.
तरी संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन या गावातील शेतरस्ते,पांदण रस्ते तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी गावकरी करीत आहेत.