नवी दिल्ली :
केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक पट्ट्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. यावर पियूष गोयल यांनी कांदा निर्यात बंदीबाबत पुर्नविचार करू, असे आश्वासन शरद पवार यांना दिले. अशी माहिती पवार यांनी ट्विटरद्वारे दिली.
दरम्यान, कांद्यावर निर्यात बंदी लावल्यावर पवार यांना विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी संपर्क केला. यावर केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केल्याची माहिती पवार यांनी दिली. आज (दि.१५) सकाळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती विशद केली. बैठकीत प्रामुख्याने कांदा उत्पादक जिरायत शेतकरी आहे. त्याचप्रमाणे हा बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक असल्याचे पवार यांनी सांगितले.
निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची खंत पवार यांनी व्यक्त केली.
या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे. अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कांदा निर्यातबंदी #onionexportban बाबत फेरविचार करावा, अशी विनंती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पवार यांनी केली.
या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही या निर्यातबंदीचा फेरविचार करू व जर एकमत झाल्यास याबाबतीत पुनर्निर्णय घेऊ, असं पियूष गोयल यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले.