मुंबई :
विद्यापीठअंतर्गत पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा ही तीन तासांऐवजी एक तासाची व 100 गुणांऐवजी 50 गुणांची घेण्यात येणार असल्याचे संकेत शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. परीक्षापद्धती, वेळापत्रक व अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावे अशा सूचना देत परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती 7 सप्टेंबरपर्यंत सरकारला कळवावी, अशा सूचना सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांना दिल्या आहेत.
अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारने कुलगुरूंच्या गठीत केलेल्या 10 जणांची समिती स्थापन केली होती. या समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. विद्यापीठांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी कमीतकमी कालावधीत परीक्षा घेताना त्या ऑनलाईन, ऑनलाईन व ऑफलाईन किंवा पेन व पेपर यांचा वापर करून घरातूनच परीक्षा घ्यावी, दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा 11 सूचना अहवालामध्ये समितीकडून मांडण्यात आल्या होत्या. यावर विद्यापीठाची शिक्षण समिती आणि परीक्षा मंडळाची तातडीने बैठक घेऊन परीक्षा कशा पद्धतीने घेता येतील, यावर चर्चा करून त्याची माहिती 7 सप्टेंबरपर्यंत सरकारला देत परीक्षेचे वेळापत्रक व अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावी, अशी सूचना सरकारकडून देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देताना तंत्रज्ञानावर अधिकाधिक भर देत लेखी परीक्षांसाठी एमसीक्यू, असाईमेंट किंवा ओपन बूकचे पर्याय उपलब्ध करून देताना प्रात्याक्षिक परीक्षा स्कायपे सारख्या मिटींग अॅप किंवा टेलिफोनिक पद्धतीने घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे विद्यापीठांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा घेण्यात अडचण असल्यास त्याची माहिती तातडीने सरकारला कळवावी, जेणेकरून परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात यूजीसीला कळवून मुदतवाढ घेण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. या समितीने केलेल्या 11 शिफारशींचा अहवाल उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. हा अहवाल पुन्हा विद्यापीठांकडे पाठविला जाणार असून विद्यापीठ प्राधिकरणांनी त्या त्या विद्यापीठांच्या परीक्षा पद्धती ठरवून, निर्णय घेऊन पुन्हा आपापले अहवाल शासनाला सादर करण्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील विद्यापीठ प्राधिकरणांच्या बैठकीत कोणत्या आणि कशा परीक्षा पद्धतींचे प्रस्ताव ठेवले जातात? ते कितपत शक्य आहेत ? आणि कुठल्या प्रकारची परीक्षा पद्धती कोणत्या विद्यापीठाकडून अवलंबली जाते आता आगामी काळात कळणार आहे.
परीक्षा पद्धती ठरविण्याची जबाबदारी विद्यापीठ प्राधिकरणावर
राज्यातील कोरोनाचा संसर्ग पाहता आणि प्रत्येक जिल्ह्यातील विविध भौगोलिक परिस्थितीचा विचार करता 13 अकृषी विद्यापीठांच्या विद्यापीठ प्राधिकरणांवर अंतिम वर्षाच्या परीक्षा पद्धती ठरविण्याचा निर्णय सोपविण्यात आला आहे. अंतिम वर्षाचं परीक्षांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींवर विद्यापीठ प्राधिकरणाने तात्काळ बैठक घ्यायच्या आहेत. विद्यापीठ प्राधिकरणामधील व्यवस्थापन परिषद, परीक्षा मंडळे, विद्यापरिषद यांनी या संदर्भातील बैठकामध्ये परीक्षा पद्धती, वेळापत्रक, कालावधी यांचे नियोजन करून सोमवारी आपला अहवाल शासन आणि उच्च शिक्षण संचालनालयाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कोण होते समितीत…
राज्यातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी दहा सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचं अध्यक्षतेखाली असणार्या या समितीमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईच्या कुलगुरु डॉ. शशिकला वंजारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ हे सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वळूकर, डॉ. विजय खोले हे निमंत्रित सदस्य आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने हे समन्वयक आहेत.