मुंबई: बहुप्रतिक्षीत असलेल्या राम मंदिर निर्मितीचे भूमिपूजन रामजन्मभूमी अयोध्येत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.
पवित्र जल व माती श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडे सुपूर्द
अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनासाठी तापी-पूर्णा संगमाचे पवित्र जल व संत मुक्ताई समाधीस्थळ येथील माती जनार्दन हरीजी महाराज यांनी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडे सुपूर्द केली आहे.
अयोध्येत भूमिपूजनासाठी देशभरातील मोजक्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून यामध्ये फैजपूर येथील सत्पंथ मंदिराचे गादीपती तथा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा समावेश आहे. या मंदिराच्या भूमिपूजनाला देशभरातील तीर्थक्षेत्र व पवित्र नद्यांच्या संगमाचे पाणी तसेच देव स्थानांच्या परिसरातील मातीचा वापर केला जाणार आहे. या अनुषंगाने जनार्दन हरिजी महाराज हे तापी-पुर्णा नदीच्या संगमावरील पवित्र पाणी आणि संत मुक्ताई समाधी मंदिर परिसरातील माती आपल्या सोबत घेऊन अयोध्येला गेले आहेत.
जनार्दन हरीजी महाराज आज अयोध्येत पोहचले आहेत. त्यांनी राम जन्मभूमी ट्रस्टला पवित्र जल व माती सुपुर्द केली. यासोबत चांदीची वीट, डायमंड व दान राशी देखील त्यांनी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज व महामंत्री चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत इंदूर येथील राधे बाबा हे देखील होते.