अकोला,दि.९- लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण भागातील दुकाने व आस्थापना खुल्या ठेवण्यासाठी दोन तासांची वेळ वाढविण्याची परवानगी देणारे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. आता(दि.९ पासून) दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी सात यावेळात सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत. तथापि, समविषम तारखांना एका बाजूचीच दुकाने खुली ठेवण्याची P1-P2 ही पद्धत मात्र पुढील आदेशापर्यंत कायम राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि.२९ जून रोजीच्या आदेशानुसार दि.३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तसेच मिशन बिगिन अगेन फेज पाच नुसार,जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. २ जून रोजी निर्गमित केलेल्या आदेशातील मुद्दा क्र. ९ (५) नुसार अकोला शहर व जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शहरी व ग्रामीण भागातील दुकाने/आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजे पर्यंत सुरु ठेवणे बाबत आदेशित करण्यात आले होते. मात्र आता (दि.९ पासून) या आदेशात बदल करण्यात आला असून अकोला शहर व जिल्हयातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील (शहरी व ग्रामीण भागातील) दुकाने / आस्थापना आठवड्यातील सातही दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरु राहतील. तथापि पूर्वीच्या दिनांक २ जून २०२० चे आदेशात नमूद केल्याप्रमाणे P1-P2 (सम विषम तारखांना) ही पद्धत मात्र पुढिल आदेशापर्यंत कायम राहिल असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे आदेश दि.३१ जुलै पर्यंत कायम राहणार असून या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.