अकोला,दि.5 (जिमाका)- सर्वत्र कोरोना विषाणुमुळे धास्तीचे वातावरण असतांना माना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ग्राम धामोरी बु. येथे आदिवासी पारधी समाजातील मुलामुलींचा बालविवाह प्रशासनाकडुन थांबविण्यात आला. धामोरी गावाच्या मुलीचा विवाह अकाला येथील एका गावातील मुलाशी मंगळवारी सकाळी 26 मे रोजी आदिवासी समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती चाईल्ड लाईन टोल फ्री क्रं. 1098 या क्रमांकावर प्राप्त झाली होती. या माहितीची दखल घेऊन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रतिनिधी तसेच बाल कल्याण समिती अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रतिनिधी, चाईल्ड लाईनच्या जिल्हा समन्वयीका सविता सेंगर सदस्या उंबरकर, तसेच चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी सदाशिव यांना निर्देश देण्यात आले. त्यानुसार माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे, तसेच धामोरीच्या सरपंच माधुरी नांदेकर, ग्रामसचिव राहुल निखाडे, तसेच जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि काटे, राजुरा सरोदेचे ग्रामसेवक देवेंद्र पोधाडे, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष हे सर्वजण पारधी वाड्यावर गेले आणि वर व वधु पक्षाकडील नातेवाईकांशी समन्वय साधुन त्यांचा बालविवाह न करण्याबाबत त्यांच्याकडून हमी पत्र लिहून घेण्यात आले.
बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार वर मुलाचे 21 व वधु मुलीचे 18 वर्षापेक्षा कमी असल्यास विवाह करू नये सदर कायद्या अंतर्गत मुलामुलीचे वय कमी असल्यास हा बालविवाह असुन तो गुन्हा ठरू शकतो. तसेच बाल मनावर वाईट परिणाम होवु शकतो. त्यामुळे असा विवाह रोखला गेला पाहिजे. जिल्ह्यामध्ये बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार ,बालकामगार, काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालके, तसेच परिस्थितीमुळे अल्पवयातच होणारे बालविवाह, यांना प्रतिबंध करणेकरीता गावामध्ये अथवा परिसरामध्ये असे काही आढळल्यास नागरीकांनी पुढाकार घ्यावा. तसेच 1098 (चाईल्ड लाईन), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.