अकोला, दि.१३ – जिल्ह्यात आज (दि.१३) सकाळ पर्यंत बाधीतांच्या संख्येचे वयोगटनिहाय विश्लेषण केले असता कोरोना विषाणू संसर्गाने बाधीत होण्याचे प्रमाण हे २१ ते ३० या वयोगटातील लोकांचे सर्वाधिक आहे. या वयोगटातील ४१ जण कोरोना बाधीत आहेत. तर मृत्यूचे प्रमाण हे वयस्कात जास्त आहे. एकूण १५ मृतकांपैकी नऊ जण हे ५० ते ७० या वयोगटातील आहेत हे विशेष. त्यातील सर्वांनाच विविध जुन्या व्याधी होत्या.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढत असलेली संख्या पाहता त्याचा फैलाव होतोय हे तर नक्कीच. पण कोरोना रुपी शत्रूने आतापर्यंत आपल्यातल्या जवळपास १५ व्यक्तिंना काळाच्या उदरात गडप केले आहे. थोडक्यात ते कोरोना विरुद्धची लढाई हरले. तर आतापर्यंत ६० जण ही लढाई जिंकून यशस्वीरित्या घरी गेले आहेत. कोरोना बाधीत व्यक्तींच्या व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
अकोला जिल्ह्यात आज अखेर(दि.१३) आढळलेले सर्वाधिक रुग्ण हे महानगरपालिका क्षेत्रातील म्हणजे १७० रुग्ण हे मनपा हद्दीच्या भागातील आहेत. अन्य नगरपालिका हद्दीत आठ तर ग्रामिण भागातील तीन जण आहेत. अकोला शहरातील व ग्रामिण भागातील मिळून तब्बल ४२ ठिकाणांहून रुग्ण आढळले आहेत. भागनिहाय बाधितांची संख्या पाहिल्यास बैदपुरा या भागात सर्वाधिक म्हणजे ४६ रुग्ण आढळले. त्याखालोखाल ११ रुग्ण ताजनगर, मोहम्मद अली रोड नऊ, मोमीन पुरा आठ, न्यू भिमनगर, माळीपुरा आणि पातूर येथील सात, कृषि नगर येथील सहा, अकोट फैल येथील पाच. सिंधी कॅम्प चार व अन्य भागात एक ते दोन रुग्ण आढळून आले आहेत.
जे रुग्ण पॉझिटीव्ह आढळले त्यांचे वयोगट पाहता आतापर्यंत फक्त सहा जण हे वयवर्ष पाच पेक्षा कमी आहेत. आठ जण दहा वर्ष वयाच्या आतील आहेत. २१ जण ११ ते २० वर्षे वयोगटातील आहेत. तर सर्वाधिक रुग्ण संख्या असलेला गट हा २१ ते ३० वयोगटातील आहे त्यांची संख्या ४१ आहे. वय वर्षे ३१ ते ४० या वयोगटात ३३ जण आहेत तर ४१ ते ५० या वयोगटात ३२ जण आहेत. ५१ ते ६० या वयोगटात २१ जण असून ६० पेक्षा अधिक २७ जण रुग्ण आहेत.
जे लोक उपचार घेतांना मयत झालेत. त्यांची संख्या आज १५ झाली आहे. त्यात एक आत्महत्या आहे. त्यामुळे कोवीडचे उपचार घेतांना १४ जण मयत झाले आहेत. या १४ जणांपैकी पाच जण हे मृतावस्थेतच रुग्णालयात आणले होते. तर ९ जणांचा मृत्यू हा दवाखान्यात उपचारा दरम्यान झाला आहे. तर मयत झालेल्या व्यक्तिंपैकी १२ व्यक्तींना काहीतरी अन्य जुन्या व्याधी होत्या. उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार, हृदयविकार इ. मृतांपैकी सर्व जण हे प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवासी आहेत. तर वयोगटनिहाय विचार केला असता मयत पावलेल्या १५ जणांपैकी नऊ जण हे ५० ते ७० या वयोगटातील आहेत. केवळ एक जण तीशीच्या आतला होता. अर्थात त्याने आत्महत्या केली होती. उर्वरीत पाच जण हे ७० पेक्षा अधिक वयाचे होते. आणि मयतांपैकी ७ पुरुष आणि आठ महिला असे प्रमाण आहे.