पुणे दि.३ संपूर्ण मे महिना लॉक डाऊन मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हातात पैसा नसल्याने शेतीची कामे करता येणार नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून मे महिन्यात शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी शासनाने आदेश जारी करावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
जून महिन्यात पावसाळा सुरुवात होणार असून, शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. मे महिन्यात शेतीची कामे उरकली नाहीतर जून मध्ये पेरणी करायला उशीर होतो. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सावकार कर्ज द्यायला तयार नाही आणि कोणी सोने गहाण ठेवायला तयार नाही अशा परिस्थितीत बँकांवर अवलंबून असलेला शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे बँकांवर अवलंबून असलेला शेतकरी कर्ज घेण्यासाठी बँकांकडे धाव घेईल. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवण्याचे नियम पायदळी तुडवले जातील. त्यासाठी बँकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही सूचना केल्या आहेत. सामाजिक अंतर राखण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे आहे त्या शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी बँकेत न बोलविता बँक अधिकाऱ्यांनीच गावा गावात जाऊन कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन त्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून द्यावीत. शिवाय मागील असलेले कर्ज आणि आताचे नवीन कर्ज विचारत घेता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसे आदेश शासनाने काढून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात तीन झोन करण्यात आले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या भागाला रेड झोन मध्ये टाकण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात अशी परिस्थिती नसल्याने त्या भागांना ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये टाकण्यात आले आहे. हे झोन शहरापुरते मर्यादित आहेत का ग्रामीण भागापूरते हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे ही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.