हिवरखेड (धीरज बजाज)- हिवरखेड हे शासन दरबारी संवेदनशील शहर वजा गाव असून येथील लोकसंख्या जवळपास पन्नास हजाराच्या घरात आहे.
कोरोनाच्या आपत्तीच्या काळात हिवरखेड ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी भिमराव गरकल हे एक सजग प्रहरी ची भूमिका बजावत असून लॉक डाऊन च्या काळात संचार बंदीचे तंतोतंत पालन व्हावे. याकरिता आपल्या जीवाचे रान करून अहोरात्र सेवा देऊन त्यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. ते सध्या स्थितीत कोरोना आणि हिवरखेड मधील भिंत ठरत आहेत. या कामी त्यांना सरपंच सौ अरुणाताई ओंकारे, माजी सरपंच सुरेश ओंकारे, आणि काही जागरूक ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी यांची खांद्याला खांदा लावून साथ मिळत आहे. सध्या ग्रामविकास अधिकारी भिमराव गरकल हेच सिंघम चित्रपटाप्रमाणे ठाणेदाराची खरी भूमिका बजावत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. ग्राम विकास अधिकारी हे कर्मचाऱ्यांचा समवेत रात्रंदिवस हिवरखेड शहरातून गस्त घालताना दिसतात. अश्या आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्यामुळे विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची पाठ थोपटली आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण वाढू नयेत म्हणून सगळीकडे दक्षता घेण्याचे निर्देश असल्यामुळे हिवरखेड परिसरातही बहुतेक नागरिक शासनाच्या निर्देशांचे पालन करीत आहेत. परंतु शहरातील काही मोजक्या ठिकाणावरील काही दुकानदार मात्र शासनाने ठरवून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त ही लालसेपोटी दुकाने सुरू ठेवणे आणि दुसरीकडे टवाळखोर युवक काही ठराविक भागांमध्ये विनाकारण गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ग्राम विकास अधिकारी गरकल हे निरंतर झटत असताना आणि नागरिकांना बंदचे पालन करण्यासाठी आवाहन करतात. परंतु बरेचदा ग्रामविकास अधिकाऱ्यांसोबत वाद घालणे, दबावतंत्राचा वापर करणे, प्रसंगी मारहाण करण्याच्या हेतूने अंगावर धावण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत त्यांनी अनेकदा ठाणेदारांना अवगत केले परंतु काहीच फरक पडत नसल्याने काही दिवसांपूर्वी सुद्धा याबाबत गरकल यांनी तहसीलदारांकडे दाद मागितल्याची माहिती होती.
गोपनीय माहिती नुसार ग्रामविकास अधिकारी यांनी आता जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांना विशेष पत्राद्वारे निराशा व्यक्त केली असून लॉकडाऊन चे तंतोतंत पालन होण्याच्या दृष्टिकोनातून वारंवार विविध उपाययोजना सुचविल्या मात्र ठाणेदारांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ठाणेदाराच्या निष्क्रियतेला कंटाळून शासनाने ग्राम विकास अधिकार्याकडे सोपविले समन्वयक हे पद काढून टाकण्याची मागणी केल्याचे गोपनीय सूत्रांकडून समजते. मात्र या सर्व घडामोडीत ग्राम विकास अधिकारी गरकल जीवाचे रान करून हिवरखेड येथील नागरिक आणि कोरोना ह्यामधील भिंत ठरत आहेत एवढे मात्र निश्चित.