अकोला- जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत २९८ कामे शेल्फवर असून मजूरांकडून मागणी होताच ही कामे सुरु होतील. सध्या जिल्ह्यात १४५ कामे सुरु असून त्यावर ८०९ मजूर काम करीत आहेत. ही संख्या अत्यल्प असून अधिकाधिक हातांना रोजगार देण्यासाठी कामांची उपलब्धता ही प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपवनसंरक्षक वि. अ. माने, जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी अनिल मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ५३५ ग्रामपंचायती असून त्यावर किमान प्रती ग्रामपंचायत पाच कामे उपलब्ध करुन दिली पाहिजे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. या कामांत कृषि विभागाअंतर्गत फळबाग लागवड, रेशिम अधिकारी कार्यालय अंतर्गत तूती लागवड, वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत रोपवाटीका तयार करणे आदी कामांना चालना द्यावी असेही निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
जिल्ह्यातील मंजूर २९८ कामांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत, तहसिलदार, गटविकास अधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रसिद्धीसाठी लावण्यात याव्या. नोंदणीकृत मजूरांनी आपापल्या ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करुन कामाची मागणी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.
अधिक वाचा: अकोट शहरात धडक कारवाई ; मास्क न घालने पडले महागात