भारतातील कोरोनाचा वेग युरोप, अमेरिकेच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. भारत गेल्या 30 दिवसांपासून दुसर्या स्टेजवरच आहे. पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू जाहीर केला त्या दिवशी भारतात 374 रुग्ण होते. नंतर पुढच्या 8 दिवसांनी एकूण संक्रमितांची संख्या 820 वर गेली. दिवसाला 100 असे हे प्रमाण होते. अमेरिकेत कोरोनाने तिसरी स्टेज गाठली तेव्हा पहिल्या 10 दिवसांतच तेथे संक्रमितांची संख्या 20 हजारांवर जाऊन भिडली होती. भारतात कोरोनाची तिसरी स्टेज म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशनची स्टेज अद्याप सुरू झाली नाही. ती होऊ नये म्हणूनच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन व कर्फ्यू जाहीर केलेला आहे.
एका मेळाव्यात आलेल्या विदेशी पाहुण्यांमुळे तसेच पुढे काही लोक देशभर विखुरल्यामुळे कोरोनाने उचल खाल्ली; पण या लोकांचीही ओळख पटवून त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. चीन, अमेरिका तसेच युरोपीय देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आपल्याला केवळ लॉकडाऊन व जनजागृतीमुळे यश आले आहे. पंतप्रधान, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, परिचारिका, परिचर, पोलीस दल, आरोग्यसेवक, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी तसेच प्रसारमाध्यमांसह प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकाला याचे श्रेय आहे.
पहिली स्टेज :
व्हायरस परदेशातून आलेल्या व्यक्तीकडून एखाद्या देशात फोफावला. भारतात हे घडले आहे. सुरुवातीला आढळलेले रुग्ण हे चीन तसेच अन्य देशांतून येथे दाखल झालेले होते.
दुसरी स्टेज :
लोकल ट्रान्समिशनची ही स्टेज आहे. जो कुणी स्थानिक नवा रुग्ण आढळला तो कधीही परदेशात गेलेला नव्हता; पण परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला आणि त्याला लागण झाली.
तिसरी स्टेज :
असे नवे रुग्ण आढळून येणे, जे स्वत:ही परदेशातून आलेले नाहीत आणि परदेशातून आलेल्या कुणाच्या संपर्कातही आलेले नाहीत. यामध्ये स्थानिकांतून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात लागण होते.
चौथी अंतिम स्टेज :
कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने समोर येतात. चीनमध्ये हे घडले आहे. इटली, अमेरिका, स्पेन, फ्रान्समध्ये घडत आहे. भारत महिनाभरापासून दुसर्या स्टेजवर आहे. हे फार चांगले संकेत आहेत.
…तर समजावे तिसरी स्टेज गाठली
एका जणाकडून व्हायरस दोन किंवा अधिक लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा तिसरी स्टेज आली, असे मानले जाते. भारतात दिवसाला सरासरी 100 नवे रुग्ण आढळत आहेत. जेव्हा हे प्रमाण एक हजारांवर जाईल, तेव्हा कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाले आहे, असे समजावे. असे उदाहरण उत्तर प्रदेशातील मीरतमध्ये बघायला मिळाले आहे. मीरतला एकाकडून 15-16 जणांना ही लागण झाली होती.
विषाणूचा विश्वसंचार…
भारतात 39 दिवसांत पहिले 50 रुग्ण आढळले. नंतर रुग्णसंख्या 100 वर पोहोचायला 4 दिवस जावे लागले. 150 वर पोहोचायलाही 4 दिवस लागले; पण त्यापुढे 200 चा आकडा आपण अवघ्या 2 दिवसांत गाठला.अमेरिकेत 10 मार्चला 1 हजार रुग्ण होते. याच दिवशी कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाली होती. नंतर पुढच्या 24 दिवसांत इथली रुग्णसंख्या अडीच लाखांवर गेली आहे. भारत एक हजाराच्या आकड्याला 28 मार्च रोजी भिडला होता.
5 एप्रिलपर्यंत भारतात रुग्णसंख्या 3,588 वर गेली. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पहिल्या 1 लाख लोकांपर्यंत व्हायला 67 दिवस लागले होते. नंतर पुढच्या एक लाख लोकांपर्यंत तो केवळ 11 दिवसांतच पोहोचला. दोनाचे तीन लाख व्हायला त्याला पुढचे फक्त 4 दिवस लागले. आता दर दिवसाला 50 हजारांपर्यंत नवे रुग्ण समोर येत आहेत. आजअखेर जगभरातील सर्व देशांत मिळून एकूण रुग्णसंख्या 11 लाख 30 हजार 591 पर्यंत पोहोचली आहे.
लॉकडाऊननंतरही पथ्ये पाळणे हाच भारतासाठी एकमेव इलाज
आपल्याकडे सरकारी रुग्णालयांतून 1700 रुग्णांमागे एक बेड आहे. नॅशनल हेल्थ प्रोफाईलच्या 2019 च्या अहवालानुसार देशात 26 हजारांहून कमी सरकारी रुग्णालये आहेत. आपल्याकडे फक्त 70 हजार आयसीयू बेड आहेत. एकूण बेड्सची संख्या 70 लाख आहे. देशभरात साधारणपणे 12 लाख अॅलोपॅथिक डॉक्टर आहेत. एकावेळी 80 टक्के हजर आहेत, असे मानले तर 1404 व्यक्तींमागे एक डॉक्टर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार एक हजार लोकांमागे एक डॉक्टर असायला हवा.
असा प्रादुर्भाव, असे नियंत्रण, अशा चुका अन् असे निराकरण
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला अर्थात 1 मार्चपर्यंत देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या केवळ 3 होती. 14 मार्चपर्यंत ही संख्या वाढून 100 झाली. 24 मार्चला या आकड्याने 500 चा टप्पा पार केला आणि 29 मार्चला हा आकडा एक हजारावर पोहोचला होता. लॉकडाऊनने तिसर्या स्टेजची वेळ येऊ दिली नाही.
नंतर एका नियोजनशून्य आयोजनामुळे अवघ्या चार दिवसांत संक्रमितांची संख्या 2 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 3-4 दिवसांत देशात कोरोनाचे जे रुग्ण आढळले आहेत, त्यातील निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण या आयोजनाशी संबंधित आहेत. शनिवारपर्यंत देशभरात त्यामुळे 1023 नवीन रुग्ण आढळले; रुग्णसंख्या 3082 वर गेली, पण प्रशासन हताश झाले नाही. बहुतांश रुग्णांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.