मुंबई : ‘चलो अयोध्या…’ असा नारा देत शिवसेनेने अयोध्येत बाबरी मशीद होती तिथे राम मंदिर उभारण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मंदिर निर्मितीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जातीने अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राम मंदिराची वीट रचली जाणार आहे. दसऱ्यानंतर तेअयोध्येला कूच करणार असून त्याची तारीख शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात घोषित केली जाणार आहे.अयोध्येतील श्री राम मंदिर न्यासाचे अध्यक्ष जनमेजयशरणजी महाराज यांनी शिवसेना भवन येथे आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले.
त्याप्रसंगी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी जनमेजयशरणजी महाराज यांचे निमंत्रण स्वीकारले असून दसऱ्यानंतर उद्धव ठाकरे आणितमाम शिवसैनिक अयोध्येला रवाना होतील, अशी माहिती या बैठकीनंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. अयोध्येला जाण्याची तारीख दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे जाहीर करतील आणि आम्ही तयारीला लागलोय, असे खासदारराऊत यांनी सांगितले. भाजपचे सरकार केंद्रात बहुमतात असूनही ते राम मंदिर उभारणीचा निर्णय घेत नाहीत याबाबत पत्रकारांनी विचारले असता खासदार राऊत म्हणाले की, भाजप रामाच्या नावावर सत्तेवर येऊनही अयोध्येत राम मंदिर उभे राहत नाही हे हिंदुत्वाचे दुर्दैव आहे. केंद्र सरकार एससी-एसटी कायद्यासह अनेक विषयांवर अध्यादेश काढू शकते तर राम मंदिर निर्मितीबाबत का काढू शकत नाही, असा सवालही त्यांनी केला.
शिवसेने शिवाय देशात इतर कोणतीही शक्ती नाही जी अयोध्येत बाबरी मशीद होती त्या ठिकाणी राम मंदिर उभारू शकते आणि म्हणूनच मी स्वत: उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले, असे जनमेजयशरणजी महाराज यांनी या बैठकीनंतर सांगितले. अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांची इच्छा आहे, असे ते म्हणाले. राष्ट्ररक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारावे, असा आग्रह मी धरला. अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहावे, असा हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ध्यास होता आणि उद्धव ठाकरे तो पूर्णत्वास नेतील असा मला विश्वास आहे, असे जनमेजय शरणजी महाराज यांनी सांगितले.
भाजप सरकार राम मंदिर निर्मिती करण्यास अपयशी ठरले आहे का, असे पत्रकारांनी जनमेजय शरणजी महाराज यांना विचारले असता ते म्हणाले की, एकदा राम मंदिर निर्मितीला प्रारंभ झाला की समुद्राला जशा सर्व नद्या येऊन मिळतात तसे सर्व पक्ष या निर्माणकार्यात सहभागी होतील. शिव आणि राम यांच्यात समन्वय झाला की लंकेवरही विजय मिळवता येतो.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola