अकोला: बंजारा समाजाने निर्माण केलेला वैभवशाली परंपरा, सांस्कृतिक सामाजिक वारसा आजही अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत असून संवाद मेळाव्याच्या माध्यमातून होणारा संवाद, विचारमंथन सामाजिक चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज केले. ते जिल्ह्यातील दगडपारवा येथील जिल्हा बंजारा संवाद मेळावा व नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी जितेंद्र महाराज पोहरादेवी, रायसिंग महाराज रायगड, प्रमोद चव्हाण,दिलीपराव जाधव, मधुकरराव पवार आदी उपस्थित होते. दगडपारवा येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी हारार्पण केले.
यावेळी श्री.राठोड म्हणाले की बंजारा समाजाला मोठा सांस्कृतिक सामाजिक इतिहास आहे. देशाच्या विकासामध्ये बंजारा समाज बांधवांचे योगदान महत्त्वपूर्ण असून तांड्यावर राहणाऱ्या समाज बांधवांपासून ते शहरात राहणाऱ्या समाज बांधवापर्यंत प्रत्येकाचा सामाजिक, आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने सर्व समाज बांधवांनी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे.