बंगळुरू : मुलीचा जन्म आणि तिचा विवाह (Marriage) या कारणांमुळे अगदी आजच्या युगातही ग्रामीण भागातल्या अनेक पालकांना, त्यांच्या कुटुंबीयांना मुलगी एक ओझं वाटू लागते. त्यातूनच ते नको ते काही तरी करून बसतात. याचं उदाहरण देणारी आणि चित्रपटात शोभेल अशी एक घटना कर्नाटकातल्या (Karnataka) कोलार (Kolar) जिल्ह्यातल्या मल्बागल (Mulbagal) तालुक्यात नुकतीच घडली. तिथे 31 वर्षांच्या एका व्यक्तीने आपल्या नियोजित वधूसह तिच्या सख्ख्या, धाकट्या, अल्पवयीन बहिणीशीही विवाह केला. वधूनेच सातत्याने मागणी केल्यानं त्या व्यक्तीनं असा विवाह केला. मात्र रविवारी (16 मे) त्या वरासह त्याच्या सासरच्या मंडळींना पोलिसांनी अटक केली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या घटनेचं वृत्त दिलं आहे.
मल्बागल तालुक्यातल्या वेगामदागू (Vegamadagu) गावातल्या सुप्रिया (21) हिच्याशी उमापती नावाच्या व्यक्तीचा विवाह ठरला होता. उमापती हा नात्याने सुप्रियाचा मामा लागतो. विवाहाच्या आधी काही दिवसांपासून सुप्रियाने उमापतीकडे मागणी केली, आपल्या 16 वर्षांच्या धाकट्या बहिणीशीही त्याने विवाह करावा. ती मूकबधिर (Deaf & Dumb) असल्याने तिचा विवाह होऊ शकणार नाही, अशी भीती तिला आणि तिच्या आई-वडिलांना वाटत होती. म्हणून उमापतीने तिचं म्हणणं मान्य केलं आणि सात मे रोजी या दोघी बहिणींशी त्याचा विवाह झाला. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाल्यावर त्यांनी तपास करून उमापती, त्याचे सासू-सासरे (म्हणजे मुलींचे आई-वडील) लग्नपत्रिका छापणारा प्रिंटर आणि विवाहविधी करणारे पुरोहित या सर्वांना ‘बालविवाह निर्बंध कायदा 2006’नुसार अटक केली.
दरम्यान, वेगामदागू गावातल्या व्यंकटस्वामी नावाच्या एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार, सुप्रियाचे वडील नागराजप्पा यांनीही दोघी बहिणींशी विवाह केले होते. सुब्बम्मा आणि रानेम्मा या बहिणींशी त्यांचा विवाह झाला होता. रानेम्मा मूक-बधिर असून त्यांना कोणीही मूलबाळ नाही. सुब्बम्मा यांना चार मुली असून त्यातल्या सर्वांत मोठ्या मुलीचं गेल्या वर्षी लग्न झालं. सर्वांत धाकटी मुलगी प्राथमिक शाळेत शिकते आहे. मधल्या दोन मुलींचा विवाह उमापती यांच्याशी करून देण्यात आला होता.
या घटनेचं वृत्त कळताच मुल्बागलमधले बालविकास प्रकल्प अधिकारी (Child Development Project Officer) रमेश यांनी गावाला भेट दिली. तेव्हा सुप्रिया तिच्या माहेरच्या गावाच्या जवळच्या गावातच असलेल्या सासरी होती. तिची धाकटी बहीण तिच्या माहेरी होती. धाकट्या मुलीची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि तिची इच्छा असेल, तर तिला तिच्या आई-वडिलांच्या घरी पाठवलं जाईल. अन्यथा बालमंदिरात तिची सोय केली जाईल, असं रमेश यांनी सांगितलं.