मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- येथील संत रविदास नगरात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय महिलेचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर महिला ही दि.९ तारखेपासून दिसून आली नव्हती.विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने लोकांनी डोकावून पाहिले असता सदर महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
सदर विहीर ६० ते ७० फूट खोल असल्याने येथील आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले होते. तब्बल दिड तासाच्या अथक परिश्रमानंतर सदर वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यास आपत्कालीन पथकाला यश आले.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी १० वाजता च्या सुमारास संत रविदास नगर येथील हरसुलकर यांच्या घराचे बाजूला असलेल्या विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर मृतदेह याच भागातील रहिवासी असलेल्या कमलाबाई लक्ष्मण ठाकूर वय 75 वर्ष यांचा असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याकरिता आपत्कालीन पथकाचे सेनापती, रितेश चिन्नप्पा,इमरान, प्रतीक देविकर,सागर वांदे,पुंडलिक संगेले, गौतम डिडोरे,रियान खान,शुभम शिंगारे,सोनू चौधरी, विकी गावंडे यांनी तब्बल दीड ते दोन तास परिश्रम घेऊन सदर मृतदेह बाहेर काढला घटनास्थळी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार शैलेश शेळके यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गावंडे करीत आहेत.