अकोला(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्हायरल आजारांच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. गावातील घराघरात वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण ‘ फणफणले ‘ असून या रुग्णांची गावातील प्रा.आ.केंद्रासह सर्वच खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गर्दी होत आहे. ही बाब अतिशय काळजीची बनलेली असून संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे.व तात्काळ सार्वजनिक पातळीवरुन उपाययोजना करण्यात यावी.अशी मागणी ग्रामंस्थाकडून केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,अकोल्यासह जिल्ह्यातील परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस थांबला असून उन्हाचा चटका चांगल्याच बनवत आहे. तर अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाचा शिरकाव होत असतो. त्यामुळे तापमानात झपाट्याने बदल होत आहे. केव्हा थंड वाटते तर केव्हा गरमी सुद्धा जास्त प्रमाणात जाणवत असते. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असून घराघरात थंडी- तापाचे रुग्ण फणफणले आहे.तर यासोबत रुग्णांना फ्लू,सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी,चक्कर येणे, मळमळणे या व्याधी सुद्धा जाणवत आहे. तर बऱ्याच जणांना संडाशी व उलट्याचा त्रास होत आहे. या आजारांमध्ये वृद्ध व्यक्ती, महिला, पुरुष सह लहान मुलांचाही समावेश आहे. या आजारांमध्ये काहींना अति तापाने टाइफाइड,निमोनिया तर संडाशी-उलट्यांनी डायरिया सारख्या आजारांची कमी-अधिक प्रमाणात लागण होत असल्याचे दिसून येत आहे. गावातील विविध आजारी रुग्णांची संख्या पाहता जणू काही गावात साथ सदुश्य आजारांची लागण झालेली आहे का? असा ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी दवाखाने सध्या विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी फुल्ल आहे.सकाळपासूनच प्रा.आ.केंद्रात तर रुग्णांच्या रांगाच्या रांगा लागत आहे. ही बाब गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गांभीर्याची बनली आहे.
●आरोग्य व ग्रा.पं. प्रशासनाने ‘अलर्ट’राहणे गरजेचे- सध्या गावात विविध आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे वातावरणातही वेळोवेळी जो बदल होत आहे त्यामुळे आजारी रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने आरोग्य प्रशासनाकडून घरोघर रुग्णांच्या तपासणीसाठी मोहीम राबवावी तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपात काळजी घेण्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हायचीगरज आहे.त्याचप्रमाणे गावात ग्रा.पं. प्रशासनाकडून साफसफाई व्हायला पाहिजे. जेणेकरून गावात कोणत्याही प्रकारच्या आजाराची साथ उद्भवणार नाही. याकरिता संबंधित प्रशासनांनी संयुक्तिक पणे ‘अलर्ट ‘ राहणे गरजेचे आहे.