अकोला,दि.27 : मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया या राज्यपुरस्कृत योजनेत प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्प किमतीच्या 30 टक्के अर्थसाह्य मिळते. जास्तीत जास्त शेतकरी, महिला व तरूण उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
अन्नधान्य प्रक्रिया, कडधान्य प्रक्रिया, फळ प्रक्रिया, भाजीपाला प्रक्रिया, बेकरी, बेदाणा निर्मिती, मसाले उत्पादने, राईस मिल, काजु प्रक्रिया, गुळ उत्पादन, तेलबिया प्रक्रिया आदी प्रकारच्या 645 कोटी रू. च्या 148 प्रकल्पांना राज्यस्तरीय बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांना प्रकल्प उभारणीनंतर प्रत्येकी पात्र प्रकल्प किमतीच्या ३० टक्के किंवा जास्तीत जास्त 50 लक्ष रू. अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
राज्यातील कृषि व अन्नप्रक्रिया उद्योगांचे उभारणीस चालना देऊन शेतकरी बांधवांना मूल्यवर्धनाद्वारे जास्तीचे उत्पन्न मिळून देण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी, महिला व तरूण उद्योजकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.