अकोला दि.15:- भारतीय हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि.15 ते 19 दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस व ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
विजा कडाडत असतांना नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
वीज वादळाची स्थिती जाणवताच टिव्ही, संगणक, इ. विद्युत उपकरणे स्त्रोतापासून (स्विचबोर्ड मधून) अलग करुन ठेवावीत. वीज वादळाच्या स्थितीत मोबाईल फोनचा वापर टाळावा. घरात वा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. खिडक्या दारे बंद करावीत. झाडाखाली आश्रय घेऊ नये. वाहनावर प्रवास करीत असल्यास आपले वाहन विजेच्या खांबाजवळ वा झाडाखाली थांबवू नये. वीज कोसळल्यास मानवी हृदय व श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. अशावेळी लगेच हृदयाजवळील भागास मालिश करावे व तोंडाद्वारे श्वसन प्रक्रियेस मदत द्यावी,
या कालावधीत सर्व यंत्रणांनी आपापल्या भागात दक्षता घ्यावी,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.