नवी दिल्ली : केरळमध्ये मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा तांडव सुरु आहे. राज्यातील कोट्टायम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तर हैदोसच घातला आहे. इथे कोसळणाऱ्या पावसामुळे चक्क एक दुमजली घर नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे, ज्यामुळे २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की नदीच्या काठावर उभे असलेले दोन मजली घर प्रथम हळूहळू एका बाजूला झुकते. मग अचानक संपूर्ण घर नदीत पडते.
अपघाताच्या वेळी घर रिकामे होते, काही लोक त्या वेळी जवळच उभे होते. केरळमध्ये रात्रभर संततधार पाऊस पडत होता, परंतु राज्याच्या बहुतांश भागात सकाळपर्यंत तीव्रता कमी झाली होती. कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर कोट्टायममध्ये १२ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशिवाय, लष्कर, नौदल आणि हवाई दलही बचाव कार्यासाठी उतरले आहेत.
त्याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राज्याच्या मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीबाबत चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले, ‘केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोललो आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर चर्चा केली. जखमी आणि प्रभावितांना मदत करण्यासाठी अधिकारी कार्यरत आहेत.’
पुढे पीएम मोदी म्हणाले, ‘मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.’ त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे काही लोकांचा मृत्यू झाला हे दुःखद आहे. पीडित कुटुंबासोबत माझ्या संहवेदना आहेत.’