अकोला – जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी आता पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी संपुर्ण संचारबंदी तसेच दररोज रात्रीची संचारबंदी, वाहनांतून प्रवास करतांना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा, गर्दीच्या ठिकाणी कोरोणा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन या व अन्य बाबींवर जोर देण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश आज सायंकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
या आदेशात म्हटल्यानुसार
१) पुढील येणाऱ्या प्रत्येक रविवारी (शनिवारचे रात्री ०८.०० ते सोमवारचे सकाळी ०६.०० वाजेपर्यंत) संपूर्ण अकोला जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संपूर्णतः संचारबंदी लागू करण्यात आले आहे. या कालावधीत कोणत्याही व्यक्तीस मुक्त संचार करता येणार नाही.
२) रात्रीची संचारबंदी- संचारबंदीच्या आदेशाचे पालन करतांना कुठल्याही व्यक्ती, नागरीकांना हालचाल करण्याकरिता व मुक्त संचार करण्याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता – १९७३ चे कलम १४४ अंतर्गत रात्री ८.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत सक्त मनाई राहील. हे आदेश दिनांक १८/०२/२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आले आहेत.
३) संचारबंदीच्या कालावधीमध्ये खालील बाबींना मुभा राहील.
अ) शासकीय तसेच खाजगी अॅम्बुलन्स सेवा.
आ) रात्रीच्या वेळेस सुरु राहणारी औषधांची दुकाने.
इ) ठोक भाजीपाला विक्री, दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी.
ई) रेल्वेने तसेच एस.टी. बस व प्रायव्हेट लक्झरीने उतरणाऱ्या प्रवाश्यांकरिता ऑटोरिक्शा.
उ) हायवेवरील पेट्रोल पंप व ढाबे.
ऊ) एम.आय.डी.सी. क्षेत्रातील उद्योग. (कर्मचारी/कामगार यांना संचाबंदीच्या कालावधीत त्यांच्या कार्यालयातील ओळखपत्राचे आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी राहील)
४) आठवडी बाजाराचे ठिकाणी होणाऱ्या गर्दीपासून कोविड-१९ चा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्यामुळे अकोला जिल्हयातील महानगरपालिका सर्व नगर परिषद व नगर पंचायती क्षेत्रातील या आठवड्यात भरविण्यात येणारे आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत आहेत.
५) लग्नसंमारंभाकरिता केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. तसेच लग्नसमारंभाकरिता रात्री ८.०० वाजेपर्यंतच खालील नमूद केल्याप्रमाणे परवानगी अनुज्ञेय राहील.
अ) महानगर पालिका क्षेत्राकरिता -उविभागीय अधिकारी, ग्रामीण भागाकरिता तहसिलदार, नगर परिषद क्षेत्राकरिता- मुख्याधिकारी नगर परिषद यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील.
आ)लग्न समारंभाचे ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक राहील.
इ) लग्न समारंभ किंवा इतर समारंभाकरिता ५० व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधीत चालक/मालक/व्यवस्थापक यांना दहा हजार रुपये दंड तसेच ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास प्रती व्यक्ती दोनशे रुपये यापैकी जी जास्त असेल त्या प्रमाणे दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांकरिता सिल करण्यात येईल.
ई) लग्नप्रसंगी अथवा कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही. आढळल्यास नियमानूसार गुन्हा दाखल करण्यात येईल.
उ) आयोजकाने लग्नाचे स्थळ तसेच किती लोक उपस्थित राहणार आहेत याची माहिती संबंधीत पोलीस स्टेशन यांना कळविणे बंधनकारक राहील.
६) चारचाकी वाहनामध्ये १ ड्रायव्हर व ३ व्यक्ती व ऑटोरिक्शा वाहनामध्ये १ ड्रायव्हर व २ सवारी यांनाच परवानगी राहील. प्रमाणापेक्षा जास्त आढळल्यास नियमानुसार दंड आकारण्यात येईल.
७) सर्व प्रकारची आस्थापना / दुकाने / बाजारपेठ/बार/हॉटेल/ सिनेमागृह/ मनोरंजन उद्याने इत्यादी सकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत सुरु राहतील.
८) अकोला जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत स्थानिक प्रशासन ( महानगरपालिका / नगरपरिषद/ नगर पंचायत /ग्राम पंचायत ) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांचे स्तरावरुन करुन गर्दीस प्रतिबंध करण्यात यावा.
९) अकोला जिल्ह्यामधील सर्व शाळा व महाविद्यालये , सर्व प्रकारची खाजगी शैक्षणीक प्रशिक्षण केन्द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दि.२८ फेब्रुवारी २०२१पर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. या कालावधीत ऑनलाईन/दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील व त्याला अधिक वाव देण्यात यावा.
१०)या आदेशापूर्वी कोविड-१९ चा प्रादुर्भाव फैलाव होवू नये या करिता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशांचे उललंघन होणार नाही या बाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.
हे आदेश गुरुवार दि.१८/०२/२०२१ मध्यरात्री पासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील,असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात म्हटले आहे.