अमरावती, दि. 4 : शेतकऱ्यांनी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी स्वत:कडील सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून बियाणे पेरणी करणेबाबत कृषि विभागाव्दारे आवाहन करण्यात आले आहे.
सोयाबीन हे स्वपरांग सिंचीत पिक असल्याने दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. कृषि सेवा केंद्रामधुन विकत घेतलेल्या प्रमाणित बियाणेपासून उत्पादीत होणारे बियाणे सतत तीन वर्षापर्यंत वापरता येते. सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्के एवढे असावे असे निश्चीत केले आहे. प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन-तीन वर्षात सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण ७० टक्के पेक्षा जास्त झालेले आहे. म्हणजेच दुप्पटीहुन ज्यादा बियाणे शेतकरी खरेदी करतात. त्यामुळे सोयाबीन बियाणे वापराबाबत
शेतकऱ्यांनी निश्चितपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. प्रमाणित बियाण्यांपासून तयार झालेल्या बियाण्याची उगवण शक्ती तपासणी करुन बियाण्याची गरज घरच्या उत्पादनातून भागविल्यास बाजारातील बियाणे मिळण्यासाठी करावी लागणारी पायपीट व बाजारातील बियाणे उगवण न झाल्यामुळे होणारा मनस्ताप सुध्दा टाळु शकतो. तसेच बियाण्यांवरील खर्च कमी होऊन उत्पादन खर्चात बचत करता येऊ शकते. त्यामुळे सोयाबीनचा उत्पादन खर्च कमी होऊन घरचे बियाणे वापरल्यास फायदेशीर ठरते.
सध्या हंगाम पूर्व पाऊस पडण्यास सुरवात झाली असुन नियमीत पाऊस सुरु झाल्यानंतर जमिनीत पुरेपुर ओल असल्याशिवाय सोयाबीन बियाण्याची पेरणी करु नये.म्हणजे कमीत कमी ७० मि.मी. ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर भरीव ओल झाल्याची खात्री झाल्यानंतर पेरणी करावी.
सोयाबीन बियाणे उगवण तपासणीची साधी व सोपी पध्दत :
सोयाबीन बियाणे दरवर्षी बदलण्याची गरज नाही, कृषि सेवा केद्रामार्फत विकत घेतलेल्या प्रमाणित
बियांपासून उत्पादीत होणारे बियाणे सतत तीन वर्षापर्यंत वापरता येते. घरच्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालुन मुठभर धान्य बाहेर काढा, सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करुन घ्यावे. गोणपाटाचे ६ चौकनी तुकडे घेवुन स्वच्छ धुवून घ्या. एक तुकडा जमीनीवर पसरवा. काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाने मोजून दीड ते दोन से. मी. अंतरावर तुकड्यावर ओळीत ठेवुन अश्या प्रकारे १०० दान्याचे ३ नमुने तयार करावे. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडुन ओले करावे व बियाणेवर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरुन पुन्हा चांगले पाणी टाकावे.
गोणपाटाच्या तुकडयाची बियाण्यासकट गोलगुडांळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. त्यावर अधुनमधुन पाणी शिंपडुन ओले ठेवावे. सहा ते सात दिवसानंतर ही गोलगुंडाळी जमीनीवर पसरुन उघडावी, चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करुन त्याची मोजणी करावी. तिन्ही गुंडाळीची सरासरी काढुन १०० दाण्यापैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाणेसारखेच गुणवत्तेचे आहे असे समजावे आणि शिफारसी प्रमाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवण झालेल्या बियाणेची टक्केवारी ७० पेक्षा कमी असेल तर एकरी बियाणेचे प्रमाण थोडे वाढवुन पेरणी करावी. ७० टक्के पेक्षा कमी बियाणे उगवले असेल तर त्या प्रमाणात बियाणेची मात्रा जास्त वाढविल्यास बाजारातील बियाणे एवढीच रोपाची संख्या राहुन अपेक्षीत उत्पादन येते.
जसे,
७० टक्के व त्यापेक्षा जास्त उगवण शक्ती असल्यास शिफारशी प्रमाणे एकरी ३० किलो बियाणे वापरावे.
६५ ते ६९ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३२.५ किलो बियाणे वापरावे.
६० ते ६४ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३५ किलो बियाणे वापरावे.
५० टक्के पेक्षा कमी उगवण शक्ती आसल्यास घरचे बियाणे न वापरता प्रमाणित बियाणे खरेदी करावे.
रायझोबीयम व पीएसबी या जिवाणु संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम १०बियाण्यास पेरणी पूर्वी ३ तास अगोदर बीज प्रक्रिया करुन सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशी रोगापासून संरक्षणासाठी बिज प्रक्रिया करावी. जमिनीत पुरेशी ओल किंवा ७० मि.मी.ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीन बियाण्याची पेरणी करावी.
उपरोक्त पध्दतीने बियाणेची पेरणी केल्यास निश्चीतपणे शेतकऱ्यांना बाजारातील बियाण्यांप्रमाणे उत्पादन येईल. तेव्हा शेतकऱ्यांनी घरचे बियाणे तपासणी करुन पेरणी करावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले आहे.