हिवरखेड (धीरज बजाज)- हिवरखेड येथील अत्यंत महत्वाचा आणि रहदारीच्या मार्गावरील दत्तभारती मंदिर नजीकचा पूल सन 2018 पासून पडलेला आहे. सदर पूल हा स्वस्तिक कॉलनी शांताई नगर, श्री गजानन महाराज मंदिर, सोनवाडी बस स्टॉप, सरकारी दवाखाना, सहदेवराव भोपळे विद्यालय, नागनाथ नगर, महावितरण कार्यालय, 132 केव्ही उपकेंद्र, इत्यादी अनेक ठिकाणांना गावातील ग्रामपंचायत, महाराजा श्री अग्रसेनजी मार्ग, जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज चौक, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट, इत्यादी मुख्य बाजारपेठेशी जोडणारा सर्वात जवळच्या मार्गावरील शॉर्टकट पूल होता.
सन 2018 मध्ये लेंडी नाल्याच्या काठावर ग्रामपंचायतच्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू असताना बांधकामासाठी गौण खनिज घेऊन आलेले जड वाहन, मोठा ट्रक ह्या जर्जर झालेल्या पुलावरून जात असताना ट्रक पुलासह नाल्यामध्ये कोसळला होता.
तेव्हापासून ह्या भागातील दोन्ही बाजूच्या नागरिकांचा जवळचा संपर्क तुटला आहे. सदर पूल तूटल्यानंतर नागरिकांचा रोष पाहता ग्रामपंचायत सदस्य श्यामशील भोपळे यांनी ह्या पुलाकरिता मोठ्या लोकप्रतिनिधींकडून निधी प्राप्त होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून पैदल आणि दुचाकीसाठी स्वखर्चातून छोट्या लोखंडी पुलाची व्यवस्था करून दिली होती. पण इतर वाहनांचा संपर्क अजूनही तुटलेला असून वाहनांना एक किलोमीटरच्या वर वळसा घालून आवागमन करावे लागत आहे. तात्पुरता पूल मागील पुरामध्ये वाहून गेला होता तो पुन्हा पूर्ववत ठेवण्यात आला. परंतु त्या लोखंडी पुलालाही आता तडे जात आहेत त्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.
सदर पुलाचे काम करण्याकरिता ग्रामपंचायत कडे निधी उपलब्ध नसल्याने आम्ही अनेक वरिष्ठ लोकप्रतिनिधींकडे अनेकदा निधीची मागणी केली आहे. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीने ह्या पूलाकरिता अजूनही निधी उपलब्ध करुन दिला नाही असे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे.
एवढेच नव्हे तर कोणत्याही मोठ्या लोकप्रतिनिधीने 2018 पासून या पुलाकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे काम सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, यापैकी कोणत्या लोकप्रतिनिधीचे आहे याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम असून उपरोक्त अनेक लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीकरिता येथील नागरिक आवर्जून मतदान करीत असतात.
परंतु तरीही हा पूल होत नसल्याने मतदान केल्यावरही आपल्याला “ते” लोकप्रतिनिधी ठेंगा दाखवत असल्याचा अनुभव परिसरातील नागरिकांना येत आहे. त्यामुळे ह्या पुलाकरिता निधी मिळेल की नाही? आणि ह्या पुलाचे बांधकाम होईल की नाही याबाबत अनिश्चिततेचे वातावरण असल्याने नागरिकांमध्ये निराशा दिसत आहे.
फोटो कॅप्शन:-
2018 पासून पडलेला हा पूल अजूनही निधीच्या प्रतीक्षेतच आहे.
प्रतिक्रिया.
जनतेकडून मतांची भीक मागणारे मोठे लोकप्रतिनिधी छोट्याशा पुलासाठी निधी उपलब्ध करून देऊ शकत नाहीत हि लाजिरवाणी बाब आहे.
प्रभाकर जाधव, नागरिक हिवरखेड.
जर वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी पुलासाठी निधी दिला नाही तर 15 व्या वित्त आयोगातून पुलाचे काम करण्यात येईल.
सौ. अरुणाताई सुरेश ओंकारे सरपंच हिवरखेड.
याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4